Total Pageviews

Saturday, January 24, 2009

पावभाजी

- मनस्विनी लता रवींद्र
(रात्र पडली आहे. दोन जोडपी रेस्तराँमध्ये बसली आहेत. मेनूकार्ड समोर)
ऋतुजा : ए, मी पावभाजी घेणार.

तपन : नेहमी पावभाजी काय घेतेस, काहीतरी वेगळं ट्राय करना.

ऋतुजा : तुला रोकतेय का मी, हवं ते खा, नंतर अॅसिडीटी झाली तरीही मी काही बोलणार नाही.

अदिती : ए, चायनीज घ्यायचं?

नीतिन : नको.

अदिती : का रे? मी जे म्हणते त्याला नको म्हणतोस तू!

ऋतुजा : म्हणूनच विचारायचंच नाही. आपल्याला हवं ते घ्यायचं बस. विचारून भाव कश्याला द्यायचा यांना एवढा?

तपन : हो रे, ही मला भावच देत नाही. हिचे आणि माझे सगळे निर्णय हिच घेते.

ऋतुजा : तू निर्णय घ्यायला शंभर तास लावतोस.

अदिती : आमच्याकडे उलटंय, आम्ही निर्णयच घेत नाही. नितीन, काय खाणार आहेस तू?

नीतिन : मला ना काहीतरी वेगळं खायचंय. म्हणजे या पंजाबी जेवणाचा कंटाळा आलाय मला. आणि चायनीज तर हॉस्टेलमध्ये रोज खायचो मी. त्यामुळे नको झालंय.

ऋतुजा : ए लवकर ठरवा. भूक लागली आहे मला. तसंही उपाशी राहण्याचा अनुभव आलाय माझ्या वाट्याला.

तपन : दर वेळेस ते उपाशी राहणं काढलंच पाहिजे का?

अदिती : का गं? काय झालं होतं?

ऋतुजा : आमचं लग्न ठरलं ना, तेव्हा हा मला पहिल्यांदा बाहेर फिरायला घेऊन गेला आणि मी तेव्हा कसं, ओळखत नव्हते याला आणि शिवाय कसं असतं ना तेव्हा, चांगलं चांगलं प्रेझेण्ट व्हावसं वाटतं. तर मी एकदम शहाणी मुलगी बनून गप्प राहिले ग. मी कॉलेजमधून याच्या ऑफिसला गेले होते. तर हा मला फिरायला म्हणून याच्या मित्राकडे घेऊन गेला. तो मित्र म्हणजे वयाने मोठाय. या वयाचे मित्र असतात, हेच मला माहीत नव्हतं. त्याने फरसाण दिलं तर मी आधी नको म्हटलं. त्यानंतर परत कोणी मला विचारलंच नाही. मस्त हे दोघं गप्पा मारत बसले. बरं पहिल्यांदा एका मुलीला बाहेर नेतो आहेस तर खायला प्यायला घालायचं, पिक्चरला न्यायचं, पण हा बुद्धूराम आहे आमचा.

अदिती : तुमचं अरेंज मॅरेज आहे म्हणून निदान तुम्ही फिरायला तरी गेलात. इथे काय प्रेमात पडलो ना, बस की, अजून कश्याला काय करायला पाहिजे. आम्ही तर पिक्चर्स पण आपापल्या मित्रांबरोबर जाऊन बघतो.

नीतिन : पण मला काय वाटतं...

अदिती : हं?

तपन : हे लोक पंजाबी भाज्यांची ग्रेव्ही सकाळीच बनवून ठेवत असतील. रात्रीपर्यंत पार शिळी झाली असेल, ते मागवणं काही योग्यच नाही.

अदिती : बघितलंस, आपण एक बोलतोस आणि याच्या डोक्यात वेगळंच चाललंय.

तपन : ए, लवकर ठरवा काय हवं ते. माझा खरंतर फिश खायचा मूड होता.

अदिती : ए, मग आधी नाही का सांगायचंस?

तपन : हो, पण ऋतुजा नाही ना खात.

ऋतुजा : ए, पण तुला कधी टोकते का मी?

तपन : बघ बघ यातच किती दमदाटी भरलीये.

ऋतुजा : तू ना माझी पार खविस बायको अशी इमेज करतोस हं.

तपन : तू माझी तक्रार केलीस ती.

ऋतुजा : अच्छा... त्याचा बदला घेतो आहेस?

तपन : मी पण मागवतो पावभाजीच. काय करणार. नाही तर घरी जाऊन...

अदिती : ठीक आहे. मी पण तेच मागवते.

नीतिन : माझं एक ऑब्झवेर्शन आहे. अरेंज मॅरेज झालेल्या सर्व बायकांना नव-याबरोबर आठवड्यातून एकदा हॉटेलिंगला जायला आवडतं आणि बहुसंख्य बायका पावभाजीच खातात.

अदिती : हे काही खरं नाही. मी पण पावभाजी मागवते आहे पण आपलं अरेंज मॅरेज नाही.

तपन : पण तू दर वेळेस पावभाजी मागवतच नाहीस.

नीतिन : करेक्ट!

ऋतुजा : घ्या एकमेकांची बाजू. मला तर वाटतं, माझ्यापेक्षा तपनला नीतिनबरोबरच वेळ घालवायला आवडतो. बघ ना सतत त्यांच मित्रप्रेम जागं होत असतं.

अदिती : तेच तर नां. आपण ना मित्रांबरोबर जास्त एन्जॉय करू शकतो, हे नवरा-बायको झालं की भांडणंच वाढतात. हो ना रे नीतिन.

नीतिन : माझा निर्णय झालाय.

अदिती : काय? मला सोडतोयस की काय? कधी? नाही म्हणजे तसं सांग मला आधी, रिप्लेसमेण्ट शोधून ठेवीन.

ऋतुजा : ए-ए-ही रिप्लेसमेण्टची आयडिया चांगली आहे. मला मिळू शकेल गं दुसरं कुणी पण तपनला कोण मिळणार. माझा बुद्धूराम आहे ग तो!!!

तपन : रिप्लेसमेण्टच बघू नंतर... अरे नीतिन ठरलं का तुझं काय मागावयाचं ते?

नीतिन : मी... अं मी पावभाजी घेईन. तिही खडा पावभाजी. तुम्ही काय घेताय?

(सगळे हसतात आणि पावभाजीवर तुटून पडतात.)

No comments: